Wednesday, 7 December 2016

मुठाई मोहत्सवात घेतली बोडखे सरांच्या कामाची दखल


पर्यावरणाचा सुरु असलेल्या ऱ्हासाबाबत आपण नेहमीच ऐकत, वाचत व बोलत असतो. परंतु हा ऱ्हास थांबविण्यासाठी खूप कमी लोक, संस्था कार्यरत असतात. पर्यावरणातील एका विषयातील समस्या सोडविण्यासाठी खूप जणांनी आपल आयुष्य वाहून घेतलेले आहे. परंतु असे लोक त्यांच्या वैयक्तिक स्तरावर काम करत असतात त्यामुळे त्याचं काम सर्वांपर्यंत पोहचत नाही. अशा लोकांना प्रकाश झोतात आणण्यासाठी जीवित नदी संस्था गेल्या दोन वर्षापासून अनसंग हिरोनावाने सत्कार समारंभ आयोजित करत आहे. यामध्ये नदी संवर्धनासाठी वैयक्तिक स्तरावर जाणीवजागृती व कृती उपक्रम राबविणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला जातो.

या वर्षी सत्कारासाठी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली गावात जि.प. प्राथमिक शाळेत  कार्यरत असणाऱ्या ध्येयवेड्या श्री बाळासाहेब बोडखे या शिक्षकाची निवड करण्यात आली आहे. कोंढार चिंचोली गावात कार्यरत असणाऱ्या बोडखे सरांचा सत्कार जलतज्ञ श्री राजेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आला.

बोडखे सर व पर्यावरण विषयाचा संबंध पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन पुरुस्कृत पर्यावरण सेवा योजनेच्या माध्यमातून आला. सदर योजनेची राज्य सनियंत्रण संस्था म्हणून पर्यावरण शिक्षण केंद्र काम पाहते. बोडखे सरांनी पर्यावरण सेवा योजने अंतर्गत पुणे येथे शिक्षक प्रशिक्षण घेवून आपल्या कामाला सुरुवात केली. पाणी, उर्जा, घनकचरा, जैवविविधता अशा विषयाचा योजनेमध्ये समावेश आहे. योजने अंतर्गत कृती उपक्रमावर जास्त भर दिला जातो. जेणेकरून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सभोवतालच्या बाबींचे निरीक्षण व अभ्यास करून पर्यावरणीय समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा असा उद्देश आहे.

कोंढार चिंचोली हे उजनीच्या धरणक्षेत्रात वसलेले पुनर्वसित गाव आहे. पूर्वी गावात पाण्याची वणवण होती, परंतु उजनी धरण झाले आणि गावाचा कायापालट झाला. गावतील लोक सधन झाली. बोडखे सर गावात साडेपाच वर्षापासून कार्यरत आहे. पर्यावरण सेवा योजने अंतर्गत त्यांनी पाणी व्यवस्थापन विषयवार काम सुरु केले तेंव्हा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. उजनी धरणामधील पाणी व या पाण्याचा गावातील नागरिकांचे आरोग्य एवढ्यापर्यंतच हा अभ्यास सीमित नव्हता. पाण्याचा गावातील नागरिकांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीवर कसा परिणाम होतो याचाही अभ्यास केला. याचबरोबर पर्यावरणीय दृष्टी पाण्याचा इतर घटकांवर होणारा परिणामही अभ्यासण्यात आला. माणसांबरोबर जनावरांवर पाण्याचा होणारा परिणाम अभ्यासण्यात आला. जनावरांच्या डॉक्टरांच्या मुलाखतीमधून अनेक धक्कादायक माहिती विद्यार्थी व शिक्षकांसमोर आली. दुषित किवा क्षार युक्त पाणी पिल्यामुळे जनावरांचा भाकड कालावधीमध्ये वाढ होत आहे, त्याचा परिणाम नागरिकांच्या आर्थिक स्थितीवर होत आहे.

याचबरोबर पर्यावरण सेवा योजने अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या पाणी तपासणी किटच्या आधारे नदीच्या पाण्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. गावतील मासेमारी व्यवसाय करणाऱ्यांची मुलाखत घेण्यात आली, माशांच्या जाती कशा प्रकारे धरणातून लुप्त होत गेल्या व सद्यस्थितीला उपलब्ध असणारी फक्त चीलापी (तिलापिया) जातीचा मासा याबाबत माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. माश्यांची कमी होणारी संख्या व त्याचा मासेमारी व्यवसायावर होणारा परिणाम व आर्थिक स्थितीवर होणारा परिणाम विद्यार्थ्यांनी समजून घेतला.

अशा प्रकरे अभ्यास करायचा म्हणून अभ्यास न करता एखाद्या समस्येच्या मुळापर्यंत जावून त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न बोडखे सर व त्यांच्या विद्यार्थ्यांनी योजने अंतर्गत केला. संकलित केलेल्या माहितीचा सहसंबंध लावण्याचा प्रयत्न केला व तो गावकऱ्यापुढे मांडला. गावकऱ्यानीही सदर अभ्यासाची दाखल घेत शाळा राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. संकलित केलेल्या माहितीच्या आधारे भविष्यात योजने अंतर्गत 
लोकसहभागातून पाणी व्यवस्थापनाचे विविध कृती उपक्रम राबविले जाणार आहेत. 

या सर्व बाबींची दाखल जीवित नदी संस्थेने घेवून बोडखे सरांचा सत्कार २६ नोव्हेंबरला बोडखे सरांचा सत्कार जलतज्ञ श्री राजेंद्र सिंह यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आला. सदर सत्कारामुळे सरांना पुढील काम जोमाने करण्याची प्रेरणा मिळाली.

सदर उपक्रम बोडखे सरांनी पर्यावरण सेवा योजनेचे विभाग समन्वयक श्री गणेश सातव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले आहेत. उपक्रम राबविताना शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय खाटमोडे, सहशिक्षक तुकाराम माळकर, इतर शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांचे अमुल्य सहकार्य लाभले.