Wednesday, 7 December 2016

मुठाई मोहत्सवात घेतली बोडखे सरांच्या कामाची दखल


पर्यावरणाचा सुरु असलेल्या ऱ्हासाबाबत आपण नेहमीच ऐकत, वाचत व बोलत असतो. परंतु हा ऱ्हास थांबविण्यासाठी खूप कमी लोक, संस्था कार्यरत असतात. पर्यावरणातील एका विषयातील समस्या सोडविण्यासाठी खूप जणांनी आपल आयुष्य वाहून घेतलेले आहे. परंतु असे लोक त्यांच्या वैयक्तिक स्तरावर काम करत असतात त्यामुळे त्याचं काम सर्वांपर्यंत पोहचत नाही. अशा लोकांना प्रकाश झोतात आणण्यासाठी जीवित नदी संस्था गेल्या दोन वर्षापासून अनसंग हिरोनावाने सत्कार समारंभ आयोजित करत आहे. यामध्ये नदी संवर्धनासाठी वैयक्तिक स्तरावर जाणीवजागृती व कृती उपक्रम राबविणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला जातो.

या वर्षी सत्कारासाठी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली गावात जि.प. प्राथमिक शाळेत  कार्यरत असणाऱ्या ध्येयवेड्या श्री बाळासाहेब बोडखे या शिक्षकाची निवड करण्यात आली आहे. कोंढार चिंचोली गावात कार्यरत असणाऱ्या बोडखे सरांचा सत्कार जलतज्ञ श्री राजेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आला.

बोडखे सर व पर्यावरण विषयाचा संबंध पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन पुरुस्कृत पर्यावरण सेवा योजनेच्या माध्यमातून आला. सदर योजनेची राज्य सनियंत्रण संस्था म्हणून पर्यावरण शिक्षण केंद्र काम पाहते. बोडखे सरांनी पर्यावरण सेवा योजने अंतर्गत पुणे येथे शिक्षक प्रशिक्षण घेवून आपल्या कामाला सुरुवात केली. पाणी, उर्जा, घनकचरा, जैवविविधता अशा विषयाचा योजनेमध्ये समावेश आहे. योजने अंतर्गत कृती उपक्रमावर जास्त भर दिला जातो. जेणेकरून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सभोवतालच्या बाबींचे निरीक्षण व अभ्यास करून पर्यावरणीय समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा असा उद्देश आहे.

कोंढार चिंचोली हे उजनीच्या धरणक्षेत्रात वसलेले पुनर्वसित गाव आहे. पूर्वी गावात पाण्याची वणवण होती, परंतु उजनी धरण झाले आणि गावाचा कायापालट झाला. गावतील लोक सधन झाली. बोडखे सर गावात साडेपाच वर्षापासून कार्यरत आहे. पर्यावरण सेवा योजने अंतर्गत त्यांनी पाणी व्यवस्थापन विषयवार काम सुरु केले तेंव्हा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. उजनी धरणामधील पाणी व या पाण्याचा गावातील नागरिकांचे आरोग्य एवढ्यापर्यंतच हा अभ्यास सीमित नव्हता. पाण्याचा गावातील नागरिकांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीवर कसा परिणाम होतो याचाही अभ्यास केला. याचबरोबर पर्यावरणीय दृष्टी पाण्याचा इतर घटकांवर होणारा परिणामही अभ्यासण्यात आला. माणसांबरोबर जनावरांवर पाण्याचा होणारा परिणाम अभ्यासण्यात आला. जनावरांच्या डॉक्टरांच्या मुलाखतीमधून अनेक धक्कादायक माहिती विद्यार्थी व शिक्षकांसमोर आली. दुषित किवा क्षार युक्त पाणी पिल्यामुळे जनावरांचा भाकड कालावधीमध्ये वाढ होत आहे, त्याचा परिणाम नागरिकांच्या आर्थिक स्थितीवर होत आहे.

याचबरोबर पर्यावरण सेवा योजने अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या पाणी तपासणी किटच्या आधारे नदीच्या पाण्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. गावतील मासेमारी व्यवसाय करणाऱ्यांची मुलाखत घेण्यात आली, माशांच्या जाती कशा प्रकारे धरणातून लुप्त होत गेल्या व सद्यस्थितीला उपलब्ध असणारी फक्त चीलापी (तिलापिया) जातीचा मासा याबाबत माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. माश्यांची कमी होणारी संख्या व त्याचा मासेमारी व्यवसायावर होणारा परिणाम व आर्थिक स्थितीवर होणारा परिणाम विद्यार्थ्यांनी समजून घेतला.

अशा प्रकरे अभ्यास करायचा म्हणून अभ्यास न करता एखाद्या समस्येच्या मुळापर्यंत जावून त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न बोडखे सर व त्यांच्या विद्यार्थ्यांनी योजने अंतर्गत केला. संकलित केलेल्या माहितीचा सहसंबंध लावण्याचा प्रयत्न केला व तो गावकऱ्यापुढे मांडला. गावकऱ्यानीही सदर अभ्यासाची दाखल घेत शाळा राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. संकलित केलेल्या माहितीच्या आधारे भविष्यात योजने अंतर्गत 
लोकसहभागातून पाणी व्यवस्थापनाचे विविध कृती उपक्रम राबविले जाणार आहेत. 

या सर्व बाबींची दाखल जीवित नदी संस्थेने घेवून बोडखे सरांचा सत्कार २६ नोव्हेंबरला बोडखे सरांचा सत्कार जलतज्ञ श्री राजेंद्र सिंह यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आला. सदर सत्कारामुळे सरांना पुढील काम जोमाने करण्याची प्रेरणा मिळाली.

सदर उपक्रम बोडखे सरांनी पर्यावरण सेवा योजनेचे विभाग समन्वयक श्री गणेश सातव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले आहेत. उपक्रम राबविताना शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय खाटमोडे, सहशिक्षक तुकाराम माळकर, इतर शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांचे अमुल्य सहकार्य लाभले.



Friday, 1 April 2016

पर्यावरण सेवा योजने अंतर्गत कोंढार चिंचोलीच्या
विद्यार्थ्यांनी साजरी केली पर्यावरणपूरक रंगपंचमी
 रंगपंचमी म्हणजेच रंगाचा सण, रंगांची मुक्त उधळण  यामध्ये लाल, गुलाबी, हिरवा, पिवळा,निळा असे विविध रंग येतात. आपण सर्वजण खूप उत्साहाने रंगपंचमी साजरीकरतो.
रंगपंचमीचा सण पूर्वापारापासून साजरा केला जातो. पूर्वी रंगपंचमी साजरी करण्याकरिता नैसर्गिक व आयुर्वेदिक रंगांचा वापर केला जात होता. कोरड्या रंगाला ‘गुलाल’ तर रंगीत पाण्याला ‘रंग’ असे म्हणत. असे नैसर्गिक रंग घरच्या घरीच बनविले जात. नैसर्गिक रंग लावल्यानंतर एकदा पाण्याने धुतले कि सगळा रंग निघून जायचा. असे रंग बनविण्यासाठी प्रामुख्याने पळस, पांगारा, जास्वंद, झेंडूची फुले, बीट, हळद, मेहंदीची पाने, डाळीचे पीठ  यासारख्या घटकांचा वापर केला जात होता.   
काळ बदलत गेला तसा रंगपंचमी साजरी करण्याची पद्धतही बदलत गेली. नैसर्गिक घटकापासून तयार केलेल्या रंगाची जागा आता रासायनिक रंगानी घेतली. नैसर्गिक रंगाच्या तुलनेत स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारे रंग सर्रास विकले जावू लागले आहेत. ओले रंग, पेस्ट, पावडर, आणि वार्निशचा रंगपंचमीनिमित्त उपयोग वाढला. रंगपंचमी
साजरी करताना आपण रासायनिक रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात करतो.
रासायनिक रंगामध्ये शरीरासाठी अत्यंत घातक अशी ऑक्साईड, कॉपर सल्फेट, अॅल्यूमिनिअम ब्रोमाईड, मर्क्युरी सल्फाईड अशी विषारी रसायने टाकलेली असतात. या रासायानामुळेच हे रंग गडद होतात व दीर्घकाळ टिकतात.
वास्तविक पाहता काही रंगांच्या डब्ब्यावर ‘केवळ औद्योगिक उपयोगासाठी’ असा स्पष्ट उल्लेख असतो. कृत्रिम रंगांचे काही परिणाम तत्काळ दिसून येतात तर काही दीर्घकाळाने दिसून येतात. यामध्ये तात्पुरता आंधळेपण, चेहऱ्यावर पुरळ येणे, त्वचेला खाज येणे याचबरोबर डोळ्यांची जळजळ होणे यासारखे परिणाम होतात. याचबरोबर कृत्रिम रंग सांडपाण्याच्या माध्यमातून पाण्यात मिसळून पाणी प्रदुषित करू शकतात.  
सध्या महाराष्ट्र दुष्काळात होरपळून निघत आहे. सर्वत्रपाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. रंग खेळताना पाण्याचा अपव्यव पण खूप होतो.
या सर्व बाबींचा अभ्यास जि.प. कोंढार चिंचोली ता.करमाळा, जि. सोलापूर शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण सेवा योजने अंतर्गत केला.यामुळे विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी करण्याचे ठरविले. विद्यार्थ्यांनी केलेल्या संकल्पाला पर्यावरण सेवा योजनेचे योजना प्रमुख बोडखे सर यांनी प्रत्यक्ष कृतीची साथ दिली.
विद्यार्थ्यांनी हळद, बीट, मेहंदी व अरारूट पावडर वापरून रंग बनविले. यामध्ये हळदीपासून पिवळा, बीटापासून गुलाबी व मेहंदीपासून काळा रंग बनविले. विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेले रंग वापरून रंगपंचमी साजरी केली. यामध्ये विद्यार्थ्यांनी ओला व कोरडा असे दोन्हीही प्रकारचे रंग बनविले.
रंग खेळून झाल्यावर विद्यार्थ्यांनी चेहरापाण्याने स्वच्छधुतला यानंतर विद्यार्थ्यांच्या असे लक्षात आले कि नैसर्गिक रंग वापरल्यामुळे त्यांची त्वचा आणखीनच उजळली. नैसर्गिक रंगाचे दुष्परिणाम होत नसून त्याचा फायदाच आहे असे विद्यार्थ्यांना लक्षात आले, शिवाय रंग बनविण्यासाठी लागणारे साहित्य परिसरातूनच उपलब्ध होते.  नैसर्गिक
रंग स्वतः बनवून वापरण्याचा विद्यार्थ्यांना अनुभव व आनंद नवीनच होता.
विद्यार्थ्यांना सदर उपक्रमास मुख्याध्यापक इवरे व्ही.एल, योजना प्रमुख बोडखे बी.पी. यांचे मार्गदर्शन मिळाले.
Add caption
नैसर्गिक रंग बनविताना योजनेतील विद्यार्थी व योजना प्रमुख श्री. बोडखे बी.पी.
नैसर्गिक रंग खेळण्याचा मनमुरादपणे आनंद घेताना विद्यार्थी

Tuesday, 21 October 2014


‘इको व्हिलेज’ अंतर्गत शाळेने पूर्ण केला कृती कार्यक्रमाचा पहिला टप्पा
शाळेचे नाव – सावित्री कन्या प्रशाला, रानमसले , ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर
  पर्यावरण सेवा योजने अंतर्गत दिनांक ११ व १२ ऑगस्ट २०१४ रोजी योजेनेत कार्यरत असणाऱ्या १६ शाळेची शिक्षक सहविचार बैठक घेण्यात आली. सदर बैठकीचा उद्देश शाळेने राबविलेल्या उपक्रमाची माहिती इतर शाळांना व्हावी, तसेच योजनेचे वार्षिक कृती कार्यक्रम आराखडा निश्चित करणे असा होता.
यामध्ये सावित्री कन्या प्रशाला, रानमसले, सोलापूर येथील शाळेने इको-व्हिलेज उपक्रम निश्चित केला. यानुसार योजना प्रमुखांनी वार्षिक कृती कार्यक्रम आराखडा निश्चित केला
सदर कृती कार्यक्रमाचे आठवडा निहाय नियोजन करण्यात आले. यानुसार शाळेने कृती कार्यक्रम राबविणे आपेक्षित होते. योजना प्रमुख श्री. संग्राम कांबळे यांनी सदर नियोजना नुसार उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.


१. वृक्षलागवड 
        I.            रोपवाटिका तयार करणे
यामध्ये त्यांनी विद्यार्थिनींच्या माध्यमातून शाळेच्या परिसरात स्थानिक वाणाच्या ५० बिया वापरून रोपवाटिका तयार केली. या ५० बियामध्ये करंज, गोड चिंच, आंबट चिंच, शिरीष, बिब्बा, जारूळ, शिंदी व सिताफळ या झाडांच्या बिया होत्या. प्रथमतः विद्यार्थीनीना मार्गदर्शक सूचनेनुसार बीजप्रक्रिया केली. काही बियांना गरम पाण्याची, काहीना गार पाण्याची, काहीना शेणाची प्रक्रिया देण्यात आली.यानंतर विद्यार्थिनीनी रोपवाटिका बनविताना पिशव्या कशाप्रकारे भरल्या जातात याबाबत माहिती घेतली व त्यानंतर स्वतः पिशव्या भरून त्यामध्ये बिया लावल्या. प्रत्येक विद्यार्थिनीला एक पिशवी दत्तक देवून सदर बियांची रुजवण क्षमतेची अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
लागवड केलेल्या ५० बियांपैकी सद्यस्थितीला चिंचेची ९, करंजचे १, शिरीषचे १ व सिताफळाचे १ अशी एकूण १२ रोपे उगवली आहेत.
        I.            वृक्षारोपण
शाळेने प.से.यो. अंतर्गत शाळा व गाव परिसरात वड व पिंपळाचे २० झाडांची लागवड केली. त्याचबरोबर शाळेला ग्रामपंचायतीमार्फत चिंच, आपटा व कडूलिंबाची झाडे मिळाली होती. यातील दोन आपट्याची झाडे शाळा परिसरात लावण्यात आले. उर्वरित रोपे गावातील नागरिकांच्या घरासमोर, परसबागेत व काही मंदिर परिसरात लावण्यात आली.
        I.            रोपांचे संरक्षण व जतन
शाळेने फक्त वृक्षारोपणाचा उपक्रम केला नाही पण वृक्षसंवर्धनासाठी टाकावू वस्तू पासून कुंपण कसे बनवू शकतो याची चाचपणी केली व प्रायोगिक तत्त्वावर शाळा परिसरात बांबूच्या काठी व खराब झालेल्या साड्यांचा वापर करून कुंपण तयार केले. त्याचबरोबर गावपरिसरात लागवड केलेल्या दोन झाडांना ग्रामस्थांच्या मदतीनी वेताच्या काड्या वापरून कुंपण तयार करण्यात आले. 

सदर उपक्रम शाळेने फक्त शाळा परिसरापुरतेच मर्यादित न ठेवता त्याचा प्रचार व प्रसार गाव परिसरात केला आहे. तसेच लोकसहभागावर शाळेने जास्तीत जास्त भर दिला आहे. विद्यार्थीनी शाळा परिसरातील रोपवाटिका व रोपांची निगा राखत आहेत, त्याचबरोबर गावपरिसरात लागवड केलेल्या रोपांची स्थिती अभ्यासून त्यांचीही निगा राखत आहेत. तसेच स्थानिक नागरिकांना सदर रोपांची काळजी घेण्याबाबत आवाहन करत आहेत. त्यांच्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळेल.
उपक्रम राबवित असताना विद्यार्थीनीना मुख्याध्यापिका सौ. अनिता गरड, योजना प्रमुख श्री. संग्राम कांबळे व शाळेतील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

                                             शाळेचे वार्षिक  कृती उपक्रम नियोजन


                                                              वृक्ष दिंडी
                                            गाव परिसरात वृक्षारोपण

                                    शाळेच्या परिसरात विद्यार्थिनीनी तयार केलेली रोपवाटिका

                        शाळा परिसरातील रोपांना विद्यार्थिनीनी अशा प्रकारे टाकावू वस्तूपासून कुंपण तयार केले.

गाव परिसरात नागरिकांच्या माध्यमातून अशा प्रकारे कुंपण तयार करण्यात आले आहे.

Wednesday, 15 October 2014


दसऱ्या निमित्त आपट्यांच्या रोपांचे वाटप 


न्यू इंग्लीश स्कूल, सोलगाव ता. राजापूर जि. रत्नागिरी 

दिनांक- ०१/१०/२०१४
=================================

"पर्यावरणाच लेणं, हेच खर सोनं" 

या सुविचाराचे महत्व पटविण्यासाठी व लोकांच्या मनात ते रुजवून ठेवण्यासाठी सोलगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केलेला हा एका छोटा, प्रायोगिक व लोकसहभागातून कृती उपक्रम. दोन दिवसावर आलेल्या दसऱ्याच्या सणानिमित्ताने प. से. यो.तील विद्यार्थ्यांनी आपट्याच्या रोपांचे वाटप व वृक्षारोपण केले. आपट्याची एकूण ६ रोपे घेऊन सरस्वती मंदिर या ठिकाणी ग्रामस्थांच्या उपस्थितीत योजनाप्रमुख श्री. सचिन पाटील सर यांनी थोडक्यात दसरा सणानिमित्त आपट्याच्या रोपावर होणाऱ्या नुकसानीबद्दल तसेच भविष्यात सदर संस्कृती, परंपरा व सण टिकून ठेवण्यासाठी आपट्यांच्या रोपांची लागवड व आवश्यक संवर्धन या विषयी  माहिती व महत्व मांडले. तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून संदेश, महेंद्र, सुचिता व मीनल यांनी माहिती दिली. कार्यक्रमास प्रथम नागरिक सरपंच सौ. मायुरीताई कुळ्ये, उप सरपंच श्री. शशिकांत बाणे ग्रामसेवक श्री गौरक्षिणात शेलार सदस्य श्री सुनील गुरव, श्री प्रभाकर गुरव व श्री विकास गुरव तसेच शिक्षक श्री पंडित सर कर्मचारी श्री अजित गुरव व विकास गुरव यांनी वृक्षारोपणास खड्डा खोदण्यास मदत केली. 
उपसरपंच, ग्रामस्थ, योजनाप्रमुख व विद्यार्थ्यांच्या हस्ते सरस्वती मंदिराच्या परिसरात एका आपट्याच्या रोपच रोपण केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता व वृक्ष संवर्धन व पर्यावरणाचे हित लक्षात ठेवून सण साजरे करण्याच्या विचाराची सुरुवात झाली. 


सरस्वती मंदिराच्या प्रांगणात उपस्थितीत ग्रामस्थांना आपट्याची रोपे भेट देताना पर्यावरण सेवा योजनेची टीम 



आपट्याच्या रोपट्याचे रोपण करताना सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, विद्यार्थी व शिक्षक.



न्यू इंग्लिश स्कूल, सोलगाव शाळेतील "पर्यावरण सेवा योजना" गट व शिक्षकवृंद.


Friday, 10 October 2014

पर्यावरण सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी बनवले निर्माल्यापासून कंपोस्ट खत.

महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग पुरस्कृत “ पर्यावरण सेवा योजने ” अंतर्गत नूतन ज्ञान मंदिर अडावद ता.चोपडा जि.जळगाव या शाळेतील ५० विद्यार्थी समवेत योजनाप्रमुख श्री.पी.डी.चौधरी यांनी  २३ सार्वजनिक “ गणपती व दुर्गा देवी  उत्सव “ मंडळांकडून विद्यार्थ्यानी अंदाजे ३० किलो  निर्माल्य  संकलित करण्यात आले व गावकऱ्यांना निर्माल्यापासून होणारे जलप्रदूषण याविषयी माहिती देण्यात आली.व निर्माल्य दान करण्याचे आवाहन करण्यात आले निर्माल्य संकलनाचा हा उपक्रम राबवण्यात आला.संकलीत निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात आले.गावातून या अभिनव उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


अडावद ता.चोपडा जि.जळगाव येथील गणेश उत्सव निर्माल्य संकलन करतांना पर्यावरण सेवा योजनेतील विद्यार्थी व योजनाप्रमुख श्री.पी.डी.चौधरी 


अडावद ता.चोपडा जि.जळगाव येथील दुर्गा उत्सव दरम्यान  निर्माल्य संकलन करतांना पर्यावरण सेवा योजनेतील विद्यार्थी व योजनाप्रमुख श्री.पी.डी.चौधरी 



निर्माल्य पासून कंपोस्ट खत                       गणेश उत्सव निर्माल्य संकलन बातमी जळगाव पुण्य नगरी दि.१६-०९-२०१४  

                     दुर्गा देवी उत्सव निर्माल्य संकलन बातमी जळगाव दैनिक सकाळ दि. ०८-१० -२०१४

Tuesday, 7 October 2014

टाकावू वस्तूपासून शाळेच्या परिसरातील झाडांना कुंपण तयार करणे

शाळेचे नाव – सावित्री कन्या प्रशाला, रानमसले, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे हा पर्यावरण सेवा योजनेतील एक मुख्य कृती कार्यक्रम आहे. याचबरोबर स्थानिक प्रजातीच्या वृक्षांचे बीज संकलन करणे, रोपवाटिका तयार करणे व वृक्षारोपण करणे हा सुद्धा प्रमुख उपक्रम आहे. योजने अंतर्गत अत्तापर्यंत शाळेने वृक्षारोपण केले होते, परंतु परिसरातील जनावरे लागवड केलेल्या रोपांची नासधूस करत असत. त्यामुळे लागवड केलेली रोपे जगू शकली नाहीत. या सर्व बाबींचा मुख्याध्यापिका सौ. अनिता गरड, योजना प्रमुख श्री. संघपाल कांबळे व सहकारी शिक्षकांनी विचार केला. त्याचबरोबर पुणे येथे पर्यावरण सेवा योजने (प.से.यो.) अंतर्गत झालेल्या सहविचार बैठकीत दिलेली वृक्षसंवर्धनाची कल्पना शिक्षकांनी प्रत्यक्षात उतरवली.

यामध्ये प्रथमतः योजना प्रमुख व प.से.यो. गटाने घराच्या परिसरात टाकून दिलेल्या बांबूच्या लाकडे एकत्रित केले. एकत्रित केलेले लाकडे योग्य मोजमाप घेवून कापून घेतले. कापून घेतलेली लाकडे  रोपांभोवती खड्डा खांदून रोवून घेतले. त्यानंतर विद्यार्थिनीनी घरातील खराब झालेल्या साड्या एकत्रित करून रोपाभावती रोवलेल्या बांबूच्या लाकडांना गुंडाळल्या जेणेकरून कोणतेही जनावर सहजरीत्या रोप खाऊ शकणार नाही.


योजना प्रमुख व विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात वृक्षसंवर्धनाच्या बाबतीत केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. याचबरोबर गावातील ग्रामस्थांना शाळेत बोलावून सदर उपक्रमाचा उद्देश व महत्त्व प.से.यो.तील विद्यार्थिनी समजावून सांगणार आहेत. शाळेमार्फत गावात वृक्षारोपण केलेले आहे, सदर रोपांचे संवर्धन अशाप्रकारे करावे याबाबत विद्यार्थिनी गावकऱ्यांना आवाहन करणार आहेत.