Wednesday, 18 June 2014

नाशिक विभाग- आयुर्वेदीक वनस्पती लागवड यशोगाथा

आयुर्वेदीक वनस्पती लागवड व  त्यांची उत्पादने तयार करणे 

आदिमानवाच्या काळापासून मानव जंगलातील शिकारीबरोबर वनस्पतीकडे लक्ष देऊ लागला. निसर्गचक्राप्रमाणे निरनिराळ्या वनस्पतींचे रूजणे, वाढणे, फुले व फळे येणे आणि परत बियांपासून त्यांचे पुनरूत्पादन होणे, याचे निरीक्षण केले. निरनिराळ्या वनस्पतींची चव, रूची, ठराविक वनस्पती खाल्ल्याने होणारा परिणाम हेही त्याने अनुभवले. त्या अनुभवाच्या व निरीक्षणाच्या साह्याने त्याने वनस्पतींचे वर्गीकरण केले,यावर  आधारित अनुभवी माणसांची परंपरा तयार होऊ लागली. वनस्पतींमध्ये ताकद देण्याची, वाढविण्याची क्षमता आहे, रोगनिवारण, वेदनाशमन इ. वैद्यकीय उद्देशांकरिता वापरण्यात येणाऱ्या वनस्पती दिव्य औषधी वनस्पती आहेत, ह्याचे त्याला ज्ञान झाले.या वनस्पतींच्या निरनिराळ्या भागांपासून (उदा.पाने, मुळे, खोड इ.) तयार केलेले काढे, अर्क,लेप       क्रियाशील रासायनिक द्रव्ये इ. स्वरूपांत या वनस्पतींचा उपयोग केला जातो.
          भारतीय ऋषि-मुनींनी प्राचीन काळापासून अनुभवसिद्ध हमखास गुण देणाऱ्या व भारतातील हवामानात चांगल्या रीतीने वाढणाऱ्या  वनस्पतींचे जतन केले. त्यांची वर्णने व उपयोग ह्यांच्या सूत्रबद्ध रचना केल्या. ऋग्वेद, आयुर्वेद व त्यानंतर चरकांचा कालखंड ह्या काळात औषधींविषयक माहितीचा आणखी आविष्कार होत गेला. चरक व सुश्रुत ह्यांचा कालखंड तर वनौषधींचा सुवर्ण काळ म्हटला पाहिजे.(मराठी विश्वकोश) 
            रकसंहितेमध्ये (मराठी विश्वकोश) ७०० च्या वर औषधी वनस्पतींची माहिती दिली आहे. इ. स. दुसऱ्या शतकातील ह्या ग्रंथामध्ये वनौषधी व त्यांचे उपयोग इतकेच नाही, तर वनस्पती कशा ओळखाव्यात, केव्हा व कशा रीतीने गोळा कराव्यात, ह्याची देखील नोंद केली गेली आहे.
            वैद्यकशास्त्राचा औषधी विद्यानावाचा एक मुख्य भाग आहे. त्यात औषधीचे वर्णन व औषधी योजना असे दोन पोट विभाग आहेत. औषधी वर्णनात झाडे ओळखणे, त्यांची उत्पत्ती व कोणता भाग वापरावयाचा ह्याचा समावेश आहे. औषधींचे रंग, आकार, विशिष्ट गुण इ. समजावून घेणे महत्त्वाचे आहे. औषधी योजनेत शरीराचे निरनिराळे भाग आणि त्यांवर विशिष्ट औषधींचा होणारा परिणाम व त्यायोगे त्या कोणत्या रोगात कशा प्रकारे वापरावयाच्या हे महत्त्वाचे आहे.   
            महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग पुरस्कृत पर्यावरण सेवा योजने अंतर्गत जनता विद्यालय कोऱ्हाटे ता.दिंडोरी जि. नाशिक हि शाळा थोडी उंच टेकडीवर असून खडकाळ जमीन आहे.  शाळेतील ५० विद्यार्थी व योजनाप्रमुख श्री.चव्हाण वाय.एस. यांनी शाळेचा मुख्य उपक्रम  “ आयुर्वेदिक वनस्पती लागवड ” हा निवडला  आहे. गावात जास्तीत जास्त आयुर्वेदिक वनस्पतींचा प्रसार व्हावा या उद्देशाने तसेच स्थानिक लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी म्हणून गावात सर्वेक्षण करून आयुर्वेदिक वनस्पती लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.


प.से.यो गटाने योजने अंतर्गत शिबिरा दरम्यान काढलेला कोऱ्हाटे गावाचा नकाशा 
प्रथम टप्प्यात शाळेच्या परिसरात वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पती लागवड करण्यात आली, अतिशय चांगल्याप्रकारे आयुर्वेदिक वनस्पतीं गार्डन,ठिबकसिंचनासह तयार करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थांना एक  व अधिक आयुर्वेदिक रोपे दत्तक दिले आहे,त्याचे संगोपन,संवर्धन,जतन इ. केले जाते. विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक वनस्पतींची बोलीभाषेतील नावे तसेच शास्त्रीय नावे,त्यांचा आयुर्वेदिक उपयोगा विषयी माहिती विद्यार्थ्यानी आत्मसात केली आहे.उदा.तुळस,कडूनिंब,अडुळसा,आवळा,कोरपड,गुळवेल,शतावरी,पळस,पानफूटी,अश्वगंधा,ओवा,पिंपळ,एरंड,फुलझाडे इ.


शाळेच्या नकाशामध्ये दर्शविलेल्या ठिकाणी औषधी वनस्पती लागवड झालेली दुसऱ्या छायाचित्रात देण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात आयुर्वेदिक वनस्पती लागवड करून त्या झाडाला स्थानिक नाव व शास्त्रीय नामफलक तयार करून लावण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी औषधी वनस्पतींचे कोणत्या आजारावर उपयुक्त व त्याची पद्धती याबाबत माहिती संकलित करण्यात आली आहे.अॅलोपॅथी औषधी पद्धती जरी लवकर आजार बरी करणारी असली तरी त्याचे भविष्यात शरीरावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते,त्यामुळे  ग्रामीण भागामध्ये सुरुवातीच्या काळापासून आयुर्वेदिक वनस्पती व त्याचे विविध भीषण आजारावर उपयुक्तता याबाबत माहिती होतीच परंतु काळाकाळाने या बाबी मागे पडत आहेत,परंतु विद्यार्थ्यांना बालवयातच या गोष्टींची जाण झाली तर आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा ठेवा जतन होण्यास नक्कीच मदत होईल.त्यामुळे औषधी वनस्पतींचे संरक्षण व संवर्धन होण्यास नक्की मोलाचा वाटा विद्यार्थी उचलतील याबाबत शंका नाही.
दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी कोऱ्हाटे गावात वेळोवेळी जाऊन प्रभात फेरी काढणे,आयुर्वेदिक वनस्पती संदर्भात जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रश्नावली च्या माध्यमातून  गावातील विविध घरांचे सर्वेक्षण करण्यात आले त्यात आयुर्वेदिक वनस्पतीचे माहिती,लागवड,उपयोग इ. गावकऱ्यांकडून त्यांची आयुर्वेदीक वनस्पतीबद्दलची मत जाणून घेण्यात आले.तसेच त्यांच्या घरी आधीपासून असलेल्या आयुर्वेदीक वनस्पती आणि त्यांना गरज असलेल्या वनस्पतींबद्दल माहिती करून घेण्यात आले आणि गावात सर्वेक्षण  करून आल्यावर गावातील लोकांनी लागवडीसाठी सहमती दर्शवली,तसेच काहींनी पहिल्या पासून लावलेली होती.त्यामध्ये सध्या शाळेत किती औषधी वनस्पती उपलब्ध आहे तसेच किती आवशकता आहे, याबाबत संख्यात्मक विश्लेषण करण्यात आले.

कोऱ्हाटे गावामध्ये प्रभात फेरी काढतांना विद्यार्थी.

प्रश्नावली भरून घेतांना विद्यार्थिनी

घोषवाक्य-
१. आयुर्वेदिक वनस्पती लाऊ दारोदारी,आरोग्यसंपदा नांदेल घरोघरी
२.आयुर्वेदिक वनस्पतीचे संवर्धन आपल्या आरोग्याचे संरक्षण
३. औषधी झाडे लाऊ आजारापासून दूर राहू

दोन दिवसीय शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः घरातून,शेतातून आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची जास्तीत जास्त रोपे आणली होती.पहिल्या दिवशी सर्वे केलेल्या घरात विद्यार्थ्यांनी गटाप्रमाणे आणलेल्या औषधी वनस्पतींची गटाप्रमाणे एकूण ११ गटामध्ये वाटणी करण्यात आली .त्यानंतर कोऱ्हाटे गावात जाऊन घराघरामध्ये आयुर्वेदीक वनस्पतींची लागवड करण्यात आली. काही झाडे जास्तीची होती ती कोऱ्हाटे ग्रामपंच्यायत,बगीचा,रस्ते इ. ठिकाणी लागवड करण्यात आली

                                  संख्यात्मक माहिती तक्ता-

एकूण विद्यार्थी
५०


एकूण लागलेले तास

१५
सर्वेक्षण केलेल्या घरांची संख्या
९३


गावामध्ये आयुर्वेदिक वनस्पती लागवड  संख्या
२०२

अ.क्र.
आयुर्वेदिक वनस्पतीचे नाव
संख्या
तुळस
१२
अडुळसा
२५
कोरफड
३७
गुळवेल
१९
कडूनिंब
हळद
११
गवतीचहा
२६
आल
पुदिना
३९
१०
आवळा
१५


ग्रामपंच्यायत कार्यालय कोऱ्हाटे येथे आयुर्वेदिक वनस्पती लावताना विद्यार्थी.

आयुर्वेदिक वनस्पती गावात लावताना विद्यार्थी.

तिसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांनी  विविध आयुर्वेदीक वनस्पतींपासून औषधी वनस्पती उत्पादने तयार करण्यात आले,त्यामध्ये कोरफड पासून कोरफड जेल तयार करणे,पुदिना पासून पुदिना रस,तुळशीचे चूर्ण,अडुळसा रस, तयार करण्यात आले व ते पारदर्शक बर्णीत संकलित करून नावे लावण्यात आली.तसेच कोणत्या आजारावर काय सेवन करावे  व त्याचे प्रमाण याबाबत माहिती संकलित करण्यात आली इ.उपक्रम  प्रभावीपणे राबविण्यात विद्यार्थ्यांना यश आले आहे.



            

औषधी उत्पादने तयार करतांना विद्यार्थी,पुदिना रस,कोरफड जेल इ.

शाळा पातळीवर उपक्रम विकसन,विद्यार्थ्यांच्या पर्यावरणीय बाबींची प्रत्यक्ष कृती करतांना विकसित झालेली समज त्यातून भविष्यात पर्यावरण संवर्धनासाठी बदललेला सकारात्मक दृष्ट्रीकोन,त्याचबरोबर गावपातळीवर केलेले उपक्रम, एकंदरीत पर्यावरण सेवा योजनेअंतर्गत शिक्षक,विद्यार्थी,ग्रामस्थ यांच्यामध्ये पर्यावरण शिक्षण या उद्देशाने दृष्टीकोनातून बदल घडवण्यासाठी योजनेकडून पडलेले एक महत्वाचे पाउल आहे.
औषधी वनस्पती लागवड संख्यात्मक माहिती विश्लेषण तक्ता

आयुर्वेदिक औषधी उत्पादने




Tuesday, 10 June 2014

पाणी व मृदा संवर्धनाकरीता शाळेच्या परिसरात खंडीत समतल चर खोदणे.


शाळेचे नाव – सुमति बालवन, गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज, पुणे

पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वासाठी  असणाऱ्या आवश्यक घटकांपैकी पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रापैकी ७१ टक्के पाणी व २९ टक्के भूभागाने व्यापलेला आहे. या ७१ टक्के उपलब्ध पाण्यामध्ये समुद्रातील पाण्याचा वाटा ९६.५ टक्के आहे. म्हणजेच ३.५ टक्के पाणी पिण्यायोग्य आहे, या ३.५ टक्क्यातील १.७४ टक्के पाणी बर्फाच्या स्वरुपात आहे. उर्वरित १.७६ टक्के पाणी पिण्याकरिता नदी, तलाव, विहीर इ. मध्ये उपलब्ध आहे.
सध्याच्या काळात बदलत्या ऋतू चक्रामुळे पाण्याचे दुर्भिक्ष तीव्रपणे जाणवत आहे. महाराष्ट्रातील मान्सून हा लहरी आहे. १२० दिवसाच्या पावसाळ्यात सरासरी तीस दिवसात भरपूर पाऊस पडतो व इतर दिवस कोरडेच जातात. त्यामुळे पाणी संवर्धन हि काळाची गरज बनली आहे.
सुमति बालवन शाळा पुणे शहरापासून जवळच असलेल्या कात्रज परिसरात गुजर-निंबाळकरवाडी येथे आहे. सदर शाळा एका छोट्याश्या डोंगरावर वसलेली आहे. शाळा गावापासून उंचीवर वसलेली असल्यामुळे पाण्याचे टंचाई जाणवते. कात्रज परिसरामध्ये सरासरी ८७३ मिमी पाऊस पडतो. परंतु यापैकी बहुतांशी पाणी परिसरातील असलेल्या डोंगर व टेकड्याच्या तीव्र उतारावरून वाहून जाते. अशीच परिस्थिती सुमति बालवनच्या परिसरात आहे. शाळेने या सर्व भौगोलिक बाबींचा अभ्यास करून पावसाच्या पाण्याचे संकलन करण्याचा उपक्रम राबविला आहे. यामधून शाळेतील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजेकारिता पाणी उपलब्ध होते. परंतु शाळेच्या परिसरात लावलेल्या झाडांना वर्षातील फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे महिन्यात पाणी मिळू शकत नाही.
सदर समस्येवर उपाययोजना करण्याकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता गुळूमकर, योजनाप्रमुख सोनाली बगाडे व पर्यावरण सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक गणेश सातव व भीमाशंकर ढाले यांनी चर्चा केली. चर्चेअंती असा निष्कर्ष निघाला कि शाळेच्या परिसरात चर खांदाव्यात. नागपूर विभागाचे जिल्हा समन्वयक भीमाशंकर ढाले यांनी शाळेच्या परिसरातील जमिनीचा उतार मोजमाप केला असता तो ७ ते ८ टक्के भरला त्या आधारे तसेच स्थानिक पर्जन्यमान, मातीचा प्रकार या आधारावर खंडित  समतल चर तयार करण्यासाठी जागेची निवड अभ्यास केला व खंडीत समतल चर खांद्ण्याची शिफारस केली.
खंडीत समतल चरीचे मुख्य कार्य –
1.      पाण्याची मुरवण करणे
2.      पाण्याचा गतिरोध
3.      पाण्याचा अपधावेध कपात
4.      मृद् – आद्रता वृद्धी
5.      मातीच्या धुपेस आळा.
खंडित समतल चर खोदान्याकरिता आवशक्य असणारी “ A” फ्रेम  विध्यार्थ्यांच्या मदतीने तयार करण्यात आली. तत्पूर्वी “ A” फ्रेम  चा उपयोग विद्यार्थ्यांना जमिनीची समांतर उतार शोधण्यासाठी उपयोग होतो व त्याची गरज समजावून दिली. तसेच मजुरांना “ A” फ्रेम चा उपयोग करून रेखांकन करून दाखवले. खंडित उतार हा विच्छेदित उतार, कमी उतार कमी ते मध्यम उतार अशा भूभागावर केला जातो याची प्रत्यक्षासहित माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. सदर चर ह्या  ४ x ०.६० x ०.४५ मी.  लांबीच्या खोदण्याच्या सूचना करण्यात आल्या.
प्रथमतःविद्यार्थ्यांच्या हातात “ A” फ्रेम देवून समांतर उतार शोधण्यास  व त्यानुसार रेखांकन करण्यास सांगितले. त्याचबरोबर चर खांदत असताना घ्यावयाच्या काळजी बाबतही प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करण्यात आले. दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थी व मजुरांनी चर खोद्ल्याच्या शाळा भेटी दरम्यान निदर्शनास आले..
खंडीत समतल चरचा फायदा अधिक अधिक वृक्षारोपण व पावसाचे पाणी जमिनीत मुराविण्याकरिता होईल. सदर उपक्रम सद्य स्थितीला शाळेच्या परिसरात राबविला गेलेला आहे. भविष्यात गावातील भौगोलिक परिस्थितीच्या आधारे व गरजेनुसार स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागाने गाव परिसरात राबविला जाईल.
सदर उपक्रम राबविताना विद्यार्थ्यांना भूगोल, भूमिती व वनस्पती शास्त्राची माहिती मिळाली. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकामध्ये वाचलेल्या संज्ञा प्रत्यक्षरीत्या कशा वापराव्यात याची माहिती मिळाली. चर खांद्ताना मोजमाप कसे घ्यावे, फुटाचे मीटरमध्ये रुपांतर कसे करावे याबाबत शिकायला मिळाले. चर कोणत्या महिन्यात खोदावी व त्याचा फायदा काय होईल याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. पर्यावरण हा विषय प्रत्यक्ष कृतीतूनच शिकायचा आहे. पाणी या विषयाअंतर्गत जल व माती संवर्धनाचा उपक्रम विद्यार्थी संज्ञा व प्रात्यक्षिकातून शिकले.

पावसाळ्याच्या पूर्व संध्येला पर्यावरण सेवा योजनेचे विद्यार्थी, शिक्षक व योजनेचे सर्व अधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीच फायदा शाळेला भविष्यात नक्कीच होईल. शाळेच्या परिसरात पाणी व माती संवर्धनाचा प्रयोग यशस्वी होईल अशी अशा करण्यास हरकत नाही. या उपक्रमात उत्साहाने सहभागी झालेले विद्यार्थी पुढे जावून गावाच्या पाणी व माती संवर्धनाबाबत नक्कीच महत्त्वपूर्ण योगदान देतील यात शंकाच नाही. 

                           गुजर-निंबाळकरवाडीचे सरपंच व शाळेचे मुख्याध्यापक, योजना प्रमुख यांच्याशी चर्चा करताना प.से.यो.चे अधिकारी


 “ A” फ्रेम पद्धतीने समांतर उताराचे मोजमाप करताना विद्यार्थी


                                                         “ A” फ्रेम पद्धतीने समांतर उताराचे मोजमाप करून रेखांकन करताना विद्यार्थी


                                                                            केलेल्या रेखांकानुसार चर खोदताना विद्यार्थी




                                                                            खोदून पूर्ण  झालेल्या खंडीत समतल चर