Tuesday, 21 October 2014


‘इको व्हिलेज’ अंतर्गत शाळेने पूर्ण केला कृती कार्यक्रमाचा पहिला टप्पा
शाळेचे नाव – सावित्री कन्या प्रशाला, रानमसले , ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर
  पर्यावरण सेवा योजने अंतर्गत दिनांक ११ व १२ ऑगस्ट २०१४ रोजी योजेनेत कार्यरत असणाऱ्या १६ शाळेची शिक्षक सहविचार बैठक घेण्यात आली. सदर बैठकीचा उद्देश शाळेने राबविलेल्या उपक्रमाची माहिती इतर शाळांना व्हावी, तसेच योजनेचे वार्षिक कृती कार्यक्रम आराखडा निश्चित करणे असा होता.
यामध्ये सावित्री कन्या प्रशाला, रानमसले, सोलापूर येथील शाळेने इको-व्हिलेज उपक्रम निश्चित केला. यानुसार योजना प्रमुखांनी वार्षिक कृती कार्यक्रम आराखडा निश्चित केला
सदर कृती कार्यक्रमाचे आठवडा निहाय नियोजन करण्यात आले. यानुसार शाळेने कृती कार्यक्रम राबविणे आपेक्षित होते. योजना प्रमुख श्री. संग्राम कांबळे यांनी सदर नियोजना नुसार उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.


१. वृक्षलागवड 
        I.            रोपवाटिका तयार करणे
यामध्ये त्यांनी विद्यार्थिनींच्या माध्यमातून शाळेच्या परिसरात स्थानिक वाणाच्या ५० बिया वापरून रोपवाटिका तयार केली. या ५० बियामध्ये करंज, गोड चिंच, आंबट चिंच, शिरीष, बिब्बा, जारूळ, शिंदी व सिताफळ या झाडांच्या बिया होत्या. प्रथमतः विद्यार्थीनीना मार्गदर्शक सूचनेनुसार बीजप्रक्रिया केली. काही बियांना गरम पाण्याची, काहीना गार पाण्याची, काहीना शेणाची प्रक्रिया देण्यात आली.यानंतर विद्यार्थिनीनी रोपवाटिका बनविताना पिशव्या कशाप्रकारे भरल्या जातात याबाबत माहिती घेतली व त्यानंतर स्वतः पिशव्या भरून त्यामध्ये बिया लावल्या. प्रत्येक विद्यार्थिनीला एक पिशवी दत्तक देवून सदर बियांची रुजवण क्षमतेची अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
लागवड केलेल्या ५० बियांपैकी सद्यस्थितीला चिंचेची ९, करंजचे १, शिरीषचे १ व सिताफळाचे १ अशी एकूण १२ रोपे उगवली आहेत.
        I.            वृक्षारोपण
शाळेने प.से.यो. अंतर्गत शाळा व गाव परिसरात वड व पिंपळाचे २० झाडांची लागवड केली. त्याचबरोबर शाळेला ग्रामपंचायतीमार्फत चिंच, आपटा व कडूलिंबाची झाडे मिळाली होती. यातील दोन आपट्याची झाडे शाळा परिसरात लावण्यात आले. उर्वरित रोपे गावातील नागरिकांच्या घरासमोर, परसबागेत व काही मंदिर परिसरात लावण्यात आली.
        I.            रोपांचे संरक्षण व जतन
शाळेने फक्त वृक्षारोपणाचा उपक्रम केला नाही पण वृक्षसंवर्धनासाठी टाकावू वस्तू पासून कुंपण कसे बनवू शकतो याची चाचपणी केली व प्रायोगिक तत्त्वावर शाळा परिसरात बांबूच्या काठी व खराब झालेल्या साड्यांचा वापर करून कुंपण तयार केले. त्याचबरोबर गावपरिसरात लागवड केलेल्या दोन झाडांना ग्रामस्थांच्या मदतीनी वेताच्या काड्या वापरून कुंपण तयार करण्यात आले. 

सदर उपक्रम शाळेने फक्त शाळा परिसरापुरतेच मर्यादित न ठेवता त्याचा प्रचार व प्रसार गाव परिसरात केला आहे. तसेच लोकसहभागावर शाळेने जास्तीत जास्त भर दिला आहे. विद्यार्थीनी शाळा परिसरातील रोपवाटिका व रोपांची निगा राखत आहेत, त्याचबरोबर गावपरिसरात लागवड केलेल्या रोपांची स्थिती अभ्यासून त्यांचीही निगा राखत आहेत. तसेच स्थानिक नागरिकांना सदर रोपांची काळजी घेण्याबाबत आवाहन करत आहेत. त्यांच्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळेल.
उपक्रम राबवित असताना विद्यार्थीनीना मुख्याध्यापिका सौ. अनिता गरड, योजना प्रमुख श्री. संग्राम कांबळे व शाळेतील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

                                             शाळेचे वार्षिक  कृती उपक्रम नियोजन


                                                              वृक्ष दिंडी
                                            गाव परिसरात वृक्षारोपण

                                    शाळेच्या परिसरात विद्यार्थिनीनी तयार केलेली रोपवाटिका

                        शाळा परिसरातील रोपांना विद्यार्थिनीनी अशा प्रकारे टाकावू वस्तूपासून कुंपण तयार केले.

गाव परिसरात नागरिकांच्या माध्यमातून अशा प्रकारे कुंपण तयार करण्यात आले आहे.

Wednesday, 15 October 2014


दसऱ्या निमित्त आपट्यांच्या रोपांचे वाटप 


न्यू इंग्लीश स्कूल, सोलगाव ता. राजापूर जि. रत्नागिरी 

दिनांक- ०१/१०/२०१४
=================================

"पर्यावरणाच लेणं, हेच खर सोनं" 

या सुविचाराचे महत्व पटविण्यासाठी व लोकांच्या मनात ते रुजवून ठेवण्यासाठी सोलगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केलेला हा एका छोटा, प्रायोगिक व लोकसहभागातून कृती उपक्रम. दोन दिवसावर आलेल्या दसऱ्याच्या सणानिमित्ताने प. से. यो.तील विद्यार्थ्यांनी आपट्याच्या रोपांचे वाटप व वृक्षारोपण केले. आपट्याची एकूण ६ रोपे घेऊन सरस्वती मंदिर या ठिकाणी ग्रामस्थांच्या उपस्थितीत योजनाप्रमुख श्री. सचिन पाटील सर यांनी थोडक्यात दसरा सणानिमित्त आपट्याच्या रोपावर होणाऱ्या नुकसानीबद्दल तसेच भविष्यात सदर संस्कृती, परंपरा व सण टिकून ठेवण्यासाठी आपट्यांच्या रोपांची लागवड व आवश्यक संवर्धन या विषयी  माहिती व महत्व मांडले. तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून संदेश, महेंद्र, सुचिता व मीनल यांनी माहिती दिली. कार्यक्रमास प्रथम नागरिक सरपंच सौ. मायुरीताई कुळ्ये, उप सरपंच श्री. शशिकांत बाणे ग्रामसेवक श्री गौरक्षिणात शेलार सदस्य श्री सुनील गुरव, श्री प्रभाकर गुरव व श्री विकास गुरव तसेच शिक्षक श्री पंडित सर कर्मचारी श्री अजित गुरव व विकास गुरव यांनी वृक्षारोपणास खड्डा खोदण्यास मदत केली. 
उपसरपंच, ग्रामस्थ, योजनाप्रमुख व विद्यार्थ्यांच्या हस्ते सरस्वती मंदिराच्या परिसरात एका आपट्याच्या रोपच रोपण केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता व वृक्ष संवर्धन व पर्यावरणाचे हित लक्षात ठेवून सण साजरे करण्याच्या विचाराची सुरुवात झाली. 


सरस्वती मंदिराच्या प्रांगणात उपस्थितीत ग्रामस्थांना आपट्याची रोपे भेट देताना पर्यावरण सेवा योजनेची टीम 



आपट्याच्या रोपट्याचे रोपण करताना सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, विद्यार्थी व शिक्षक.



न्यू इंग्लिश स्कूल, सोलगाव शाळेतील "पर्यावरण सेवा योजना" गट व शिक्षकवृंद.


Friday, 10 October 2014

पर्यावरण सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी बनवले निर्माल्यापासून कंपोस्ट खत.

महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग पुरस्कृत “ पर्यावरण सेवा योजने ” अंतर्गत नूतन ज्ञान मंदिर अडावद ता.चोपडा जि.जळगाव या शाळेतील ५० विद्यार्थी समवेत योजनाप्रमुख श्री.पी.डी.चौधरी यांनी  २३ सार्वजनिक “ गणपती व दुर्गा देवी  उत्सव “ मंडळांकडून विद्यार्थ्यानी अंदाजे ३० किलो  निर्माल्य  संकलित करण्यात आले व गावकऱ्यांना निर्माल्यापासून होणारे जलप्रदूषण याविषयी माहिती देण्यात आली.व निर्माल्य दान करण्याचे आवाहन करण्यात आले निर्माल्य संकलनाचा हा उपक्रम राबवण्यात आला.संकलीत निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात आले.गावातून या अभिनव उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


अडावद ता.चोपडा जि.जळगाव येथील गणेश उत्सव निर्माल्य संकलन करतांना पर्यावरण सेवा योजनेतील विद्यार्थी व योजनाप्रमुख श्री.पी.डी.चौधरी 


अडावद ता.चोपडा जि.जळगाव येथील दुर्गा उत्सव दरम्यान  निर्माल्य संकलन करतांना पर्यावरण सेवा योजनेतील विद्यार्थी व योजनाप्रमुख श्री.पी.डी.चौधरी 



निर्माल्य पासून कंपोस्ट खत                       गणेश उत्सव निर्माल्य संकलन बातमी जळगाव पुण्य नगरी दि.१६-०९-२०१४  

                     दुर्गा देवी उत्सव निर्माल्य संकलन बातमी जळगाव दैनिक सकाळ दि. ०८-१० -२०१४

Tuesday, 7 October 2014

टाकावू वस्तूपासून शाळेच्या परिसरातील झाडांना कुंपण तयार करणे

शाळेचे नाव – सावित्री कन्या प्रशाला, रानमसले, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे हा पर्यावरण सेवा योजनेतील एक मुख्य कृती कार्यक्रम आहे. याचबरोबर स्थानिक प्रजातीच्या वृक्षांचे बीज संकलन करणे, रोपवाटिका तयार करणे व वृक्षारोपण करणे हा सुद्धा प्रमुख उपक्रम आहे. योजने अंतर्गत अत्तापर्यंत शाळेने वृक्षारोपण केले होते, परंतु परिसरातील जनावरे लागवड केलेल्या रोपांची नासधूस करत असत. त्यामुळे लागवड केलेली रोपे जगू शकली नाहीत. या सर्व बाबींचा मुख्याध्यापिका सौ. अनिता गरड, योजना प्रमुख श्री. संघपाल कांबळे व सहकारी शिक्षकांनी विचार केला. त्याचबरोबर पुणे येथे पर्यावरण सेवा योजने (प.से.यो.) अंतर्गत झालेल्या सहविचार बैठकीत दिलेली वृक्षसंवर्धनाची कल्पना शिक्षकांनी प्रत्यक्षात उतरवली.

यामध्ये प्रथमतः योजना प्रमुख व प.से.यो. गटाने घराच्या परिसरात टाकून दिलेल्या बांबूच्या लाकडे एकत्रित केले. एकत्रित केलेले लाकडे योग्य मोजमाप घेवून कापून घेतले. कापून घेतलेली लाकडे  रोपांभोवती खड्डा खांदून रोवून घेतले. त्यानंतर विद्यार्थिनीनी घरातील खराब झालेल्या साड्या एकत्रित करून रोपाभावती रोवलेल्या बांबूच्या लाकडांना गुंडाळल्या जेणेकरून कोणतेही जनावर सहजरीत्या रोप खाऊ शकणार नाही.


योजना प्रमुख व विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात वृक्षसंवर्धनाच्या बाबतीत केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. याचबरोबर गावातील ग्रामस्थांना शाळेत बोलावून सदर उपक्रमाचा उद्देश व महत्त्व प.से.यो.तील विद्यार्थिनी समजावून सांगणार आहेत. शाळेमार्फत गावात वृक्षारोपण केलेले आहे, सदर रोपांचे संवर्धन अशाप्रकारे करावे याबाबत विद्यार्थिनी गावकऱ्यांना आवाहन करणार आहेत.    


Wednesday, 1 October 2014

विद्यार्थ्यांनी साजरा केला पर्यावरणपूरक गणेशोत्सव
शाळेचे नाव – सुमति बालवन, गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज, पुणे
सुमति बालवन शाळेमध्ये पर्यावरण सेवा योजना तीन वर्षापासून कार्यरत आहे. शाळेमध्ये योजने अंतर्गत विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यामध्ये योजनेच्या माध्यमातून फक्त जनजागृती न करता प्रत्यक्ष कृतीमधून विविध गोष्टी कशाप्रकारे बिंबवल्या जातील यावर मुख्याध्यापिका व योजना प्रमुखांचा भर असतो.
याचाच एक भाग म्हणून शाळेत प्रत्येक वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. विद्यार्थ्यांनी गाव परिसरात जावून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यापुर्वी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शाडू मातीचे गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर कार्यशाळेस ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.  ८ विद्यार्थ्यांचा एक याप्रमाणे विद्यार्थ्यांचे ६ गट तयार करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी १३ गणपतीच्या शाडू मातीच्या मूर्ती बनविल्या. मूर्तिकार श्री. चेतन यांनी शाडू मातीचे गणपती बनविण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणपती बनविण्याचा आनंद घेतला. सदर उपक्रम विद्यार्थी फक्त गणपती बनविण्यापुरता मर्यादित ठेवणार नाहीत. विद्यार्थी या गणपतींची प्रतिष्ठापना शाळेत व निवडक विद्यार्थ्यांच्या घरी करणार आहेत. लहानपनातच विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनात उचललेले पाऊल नक्कीच बहुमुल्य आहे.
सदर उपक्रम राबविताना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता गुळूमकर व योजना प्रमुख सोनाली बगाडे मॅडम यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

   
विद्यार्थ्यांना शाडू मातीचे गणपती बनविण्याचे मार्गदर्शन करताना मूर्तिकार चेतन

शाडूच्या मातीचे गणपती बनविताना विद्यार्थी

विद्यार्थ्यांनी बनविलेला शाडू मातीचा गणपती

विद्यार्थ्यांनी बनविलेले शाडू मातीचा गणपती

शाडू मातीच्या गणपतीला पर्यावरणपूरक रंग देताना विद्यार्थी

रंग देवून झालेली गणपतीची मुर्ती 
दैनिक लोकमतने सुमति बालवन शाळेने राबविलेल्या उपक्रमाची बातमी दि. २९/०८/२०१४ रोजी प्रसिद्ध केली.

 

Monday, 22 September 2014


रोपवाटिका...एक हरित पाउल.

परिसंस्था म्हणजे जैविक व अजैविक गोष्टींच्या सहसंबंधातून तयार झालेला समूह. निसर्गाच्या विविध चक्रातून उदा. जलचक्र, नायट्रोजन चक्र ई. च्या माध्यमांतून त्यांचा सहसंबंध जपला जातो. परीसंस्थेमध्ये स्थानिक वनस्पती, प्राणी, पक्षी, जलचर तसेच कीटक हे गुंतागुंतीचे जीवन जाळे तयार करतात. त्या सर्वांचे अस्तित्व हे एकमेकाच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. जीवन आवश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी एकमेकांवर विसावणे हे परीसंस्थेचे वैशिष्ट्य या संपूर्ण जीवांची गुंतागुंतीचे विविध जाळे विणतो जसे कि अन्नजाळे व जीवन जाळे व प्रत्येकाला वेगळे महत्व प्रदान करतो. हेच जाळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास व स्थिरावण्यास मदत करतात. परिसंस्थेमध्ये झाडांचे एक विशेष स्थान आहे. निसर्गात प्राथमिक उत्पादक व अन्न साखळीची प्रथम व महत्वाची कडी अशी भूमिका त्यांना एक आदराचे स्थान देवून जाते. वराह पुराणामध्ये असे लिहिले आहे की

यावत् भूमंडलात् धत्ते सशैलवनकाननम्
तावत् तिष्ठन्ति मेदिन्यां संतति पुत्र पौतृकी II
देहन्ते परमं स्थानम् यतसुरैरपि दूर्लभम् I
प्राप्नोति पुरूषोनित्यं महामाया प्रसादतः II

 याचा अर्थ असा कि जो पर्यंत या पृथ्वीवर पर्वत, वने आणि सरोवरे आहेत तोपर्यंत जीवांची उत्पती होऊन ते सुखाने जगतील. ज्यांना ही गोष्ट कळेल त्यांना महामायेच्या (निसर्गदेवतेच्या) प्रसादासह देवांनाही दुर्लभ असे परमस्थान प्राप्त होईल (संधर्भ: आपले वृक्ष- श्री. द. महाजन). पक्ष्यांसमवेत इतर जीवांसाठी खाद्य, निवारा तसेच घरट्यासाठी काड्या पाने, फुलपाखरे विशिष्ट झाडांच्या पानांवर अंडी घालतात व नंतर त्याच्या आळ्या सदर पाने खातात. जमिनीवर गळून पडलेली पाने कुजल्यावरती त्यातील पोषकद्रव्ये मातीत मिसळून जमिनीची पोत वाढविण्यास तसेच जलचक्र अबाधित ठेवण्यातही मदत करतात. एक झाड हे जणू एक परिसंस्था असते ती निसर्गातील प्रत्येक सजीवाच्या सहजीवनामध्ये महत्वाची भूमिका बजावते. त्याचप्रमणे निसर्गातील इतर अजैविक घटकांच्या बाबतीत ही महत्वाची भूमिका निभावतात जसे कि माती ची धूप वाचविण्यास, बाष्पोत्सार्जन प्रक्रियेद्वारे जल चक्रात अशा पारंपरिक प्रकीरियेत व नवीन माहितीतून पुढे आलेल्या माहितीनुसार ध्वनी कंपने शोषुन ध्वनी प्रदूषण कमी करण्यात मदत करतात. एकंदरीतच निसर्गाचा समतोल राखण्यामध्ये झाडांचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे स्थानिक वृक्षांचे महत्व अधिक वाढते.
आपल्या भागात नैसर्गिक रीतीने वाढणारे वृक्ष ते आपले वृक्ष! दुर्दैवाने, स्थानिक वृक्ष, जीवन जाळीची एक महत्वाची कडी, धोकादायक वेगाने नष्ट होत आहेत. एखाद्या स्थानिक वृक्षाच्या प्रजातीचे नष्ट होणे म्हणजे त्या परीसंस्थेतील त्या वृक्षावर अवलंबून असणारा कीटक प्रजाती नष्ट होतील म्हणजेच त्या किटकाचे भक्षण करणारा पक्षी देखील नष्ट होण्याची शक्यता असते. आपणा सर्वांनातर डोडो पक्षी व कॅल्वेरिया मेजर या झाडाची गोष्ट माहितीच आहे, डोडो पक्ष्याची प्रजाती समूळ नष्ट झाल्यावरती सदर झाडाचे बीज प्रसारण झालेच नाही व जी प्रक्रिया त्या बियांवरती अन्ननलीकेतून होत असायची ती प्रक्रिया बंद झाल्याने कॅल्वेरिया मेजर हि  झाडांची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आपल्या परिसरात ही अशी सहसंबधाची बरीच उदाहरणे दिसून येतात, त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका हा स्थानिक जातींच्या झाडांचे कमी होणारे प्रमाणे एकंदरीत काय तर अधिवास नष्ट-प्रजाती नष्ट!
महाराष्ट्राला पश्चिम घाटाच्या माध्यमातून समृद्ध अशी वनसंपदा व वन्यजीवांची संपत्ती लाभली आहे. गेले हजारो वर्ष मनुष्य ही निसर्ग संपत्ती प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात उपभोगत आहे. दैनंदिन उपजीविकेसाठी जंगलातील विविध घटकांचा वापर हा काही नवीन नाही व तेवढाच पर्यावरण पूरक होता कारण कि तो संतुलित वापर असायचा. परंतु, वाढत चाललेली लोकसंख्या, औद्योगीकरण, प्रदूषण, जंगलतोड, वणवा, चराई आणि खाणकाम अशा प्रश्नांनी जंगले नाहीसे होत चालली आहेत. न्यू इंग्लिश स्कूल सोलगाव हे रत्नागिरीतील पश्चिम घाटात वसलेले एक खेडे गाव. पूर्वी निसर्गसौंदर्याने नटलेले हे गाव आता विकासाच्या व बदलत्या शेती पद्धती व आंबा व काजू सारख्या एकसुरीच्या लागवडीमुळे इतर झाडांच्या प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत. एकेकाळी मुबलक असणाऱ्या स्थानिक प्रजातींच्या वनस्पतींचे प्रमाण कमी होत चालले असल्याचे एकंदरीतच परिसराचा अभ्यास व पाहणी केल्या असता तसेच जुन्या जाणत्या नागरिकांच्या बोलण्यातून जाणवते. अर्थातच ही सुरुवात आहे व जे काही भविष्यात होणार आहे ते पर्यावरण अथवा मनुष्य या दोघांच्याही हिताचे नव्हते. सदर परिस्थीची गंभीरता ज्या वेळेस विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आली त्यावेळी हे सर्व विधारक होते ज्या वेळीस त्यांना पूर्व व सद्य स्थितीचा फरक समजाविण्यात आला तसेच स्थानिक व विदेशी वृक्ष कोणते; विदेशी वृक्षांचे अपाय काय व त्यांच्या लागवडीमुळे ओढवणाऱ्या संकटापासून वाचण्यासाठी आपण काय करू शकतो हे सांगितल्यानंतर त्यांनाही काहीतरी नवीन करण्याची उर्मी आली. चर्चेअंती असे ठरविण्यात आले होते कि स्थानिक प्रजातींच्या रोपांची रोपवाटिका करून त्यांचे वृक्षारोपण शाळेच्या आवारात, रस्त्यांच्या कडेला तसेच पडीक जमिनीवरती इत्यादी ठिकाणी करावयाचे. कोणत्या प्रजातीची रोपे लावावीत, रोपवाटिका कशी तयार करावी, कुंपणे, खते, पुरण भरणे इत्यादी तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण योजना प्रमुख श्री. सचिन पाटील यांना पर्यावरण शिक्षण केद्र आयोजित प्रशिक्षण कार्यशाळे दरम्यान मिळाले व या उपक्रमाच्या नियोजन ते अंमलबजावणी च्या प्रत्येक टप्प्यास मार्गदर्शक ठरले. नियोजनाप्रमाणे स्थानिक प्रजातीचे लहान रोपे आणून त्यांची शाळेच्या आवारात छोटीशी रोपवाटिका तयार करून काही कालावधीनंतर त्यांचे रोपण करायचे निश्चित झाले. याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी ५० विद्यार्थ्यांचे ५ विद्यार्थ्यांचा एक असे एकूण १० गट पाडण्यात आले व रोपावाटीकेची कार्ये ही वाटून देण्यात आली. देशात एक मुल एक झाड असा कार्यक्रम राबवीत असताना येथे एका विद्यार्थी ३ टे ४ रोपांची पूर्ण निगा राखत होता! या संपूर्ण प्रक्रियेदरम्याण एक महत्वाचा बदल नकळत घडत होता; तो म्हणजे “रोपटे व विद्यार्थी यांच्यातील नाते”. फक्त वृक्षारोपण करून सदर कार्य संपत नसून लावलेली रोपे ही जगली पाहिजेत व ती विद्यार्थ्यांच्या सहाय्याने जगवली पण पाहिजेत ही काहीशी अडचणीची वाटणारी गोष्ट या स्थापित झालेल्या नवीन नात्यामुळे सहज शक्य अशी भासू लागली.
रोपावाटीकेची सुरवात विविध झुडूप वर्गीय, औषधी, फळझाडे इत्यादी विविध प्रकारची रोपांच्या संकलाणाने सुरु झाली.
रोप
संख्या
कोरफड
अडुळसा
मावडा
ओवा
कडुलिंब
गवती चहा
कडीपत्ता
१५
कोकम
दालचिनी
आंबा
६२
गुलाब
२५
काजू
१३
पेरू
चिकू
तेरवड
एकूण
१७०

बनविलेल्या गटांमधून ही रोपे त्यांची निगा राखण्याची जबाबदारीसाठी वाटून दिली. गावातील मोकाट व चरण्यासाठी सोडलेल्या जनावरांपासून रोपांचे सरंक्षण करण्यासाठी वाळलेल्या फांद्यांचे तसेच बांबूपासून ४ ते ५ फुट उंचीची सरंक्षण भिंत बांधली. रोपांच्या योग्य वाढीसाठी “ग्रीन हाउस” सारखा प्रयोग ही विद्यार्थ्यांनी राबविला त्यामुळे रोपवाटिकेस नियंत्रित वातावरण पुरविण्यास मदत झाली. रोपांना पाणी झाऱ्याने ग्रामपंचायतीच्या १००० लिटरच्या पाण्याच्या टाकीतून मधल्या सुट्टीत घालायची जबाबदारी प्रत्येक गटाला एक दिवसांप्रमाणे नेमून दिली गेली होती.  हिरवीगार व टवटवीत दिसणाऱ्या रोपांकडे पाहून न चुकता पार पाडलेल्या या जबाबदारीची पोचपावती आपोआप मिळते. याचबरोबर शाळेमध्ये गांडूळ खताचा प्रकल्प सुरु होताच, त्यातून निर्माण झालेला खत विद्यार्थ्यांनी रोपांची मुलद्रव्यांची भूक खत घालून भागविली. यामुळे शाळेतील कुजणाऱ्या कचऱ्याचे उपयुक्त अशा खतामध्ये रुपांतरीत करण्यास व कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास मदत झाली.
उपक्रम राबवीत असताना बऱ्याच अडचणी येत होत्या. जनावरांपासून रोपे खाण्याच्या भीती पासून ते पाण्यासारख्या कोकणातील भीषण समस्या ही मोठी अडचण होती. रोपावाटीकेसाठी पाणी ही मोठ्या प्रमाणात लागत होते. शाळेत पाण्याचा एकमेव स्त्रोत म्हणजे ग्रामपंचायतीची १००० लिटरची सेंटेक्स ची टाकी, ज्याचा मुख्य वापर ग्रामपंचायत कार्यालय व विद्यार्थ्यांसाठी पिण्यासाठी होता. शाळेच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या मदतीने पाणी झाऱ्याने रोपवाटीकेस उपलब्ध करून दिले जायचे परंतु शाळांना सुट्टी लागताच हे नियोजन निरोपयोगी ठरायचे. मेहनतीने वर्षभर जगविलेली रोपे उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या अभावाने मरू नयेत यासाठी १००० लिटरची टाकी योजनेतील निधीअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आली. भविष्यात सदर टाकी ही शाळेच्या नवीन इमारतीमध्ये छतावरील पाण्याचे संकलन करून ठेवण्यासही वापरण्यात येणार आहे. शाळेतील शिपाई सुट्टी दरम्यान सदर टाकीतील पाणी रोपांना देऊन त्यांची योग्य ती काळजी घेईल असे नियोजन शाळेने आखले आहे.
या सर्व प्रयत्नातून निश्चितच स्थानिक प्रजातीच्या झाडांची रोपण करून निसर्गाचा समतोल पुनर्वत होण्याची आशा आहे. तंत्रीकबाबी पाहता असे लक्षात येते कि, सुद्रुड व निरोगी रोपे तयार करण्याचा शाळेचा प्रयत्न योग्य मार्गाने चालला आहे. येत्या जुलै २०१४ महिन्या मध्ये सदर १७० झाडांचे वृक्षारोपण करण्याचे नियोजित आहे. योजनेंतर्गत सहभागी ५० विद्यार्थ्यांमधील प्रत्येक विद्यार्थी ३ ते ४ रोपांची पुढील २ वर्षांसाठी काळजी घेईल व त्याच्या पुढच्या वर्षीच्या नवीन गटाकडे जबाबदारी सुपूर्त करतील. अशा रीतीने जुनी रोपे सांभाळली ही जातील व नवीन रोपे रोपवाटिकेत तयार करून रोपण ही केले जातील. तसेच रोपे विकत आणण्यापेक्षा या वर्षी बीज संकलन करून त्यांपासून रोप तयार करून रोपवाटिका तयार करण्याचा नवीन संकल्प ही शाळेने हाती घेतला आहे. उन्हाळी सुट्टीच्या आगोदरच योजनाप्रमुखांच्या मार्गदर्शनखाली सर्व गटांनी मिळून आपट्याच्या झाडांच्या बिया संकलित केल्या व उन्हाळी सुट्टी दरम्यान बीज संकलित करावयाच्या उपक्रमाचे थोडक्यात कृतीआधारे प्रशिक्षण ही घेतले. दसऱ्याच्या सणावेळी आपट्याची पाने तोडण्याऐवजी शाळेतील रोपवाटिकेत तयार करण्यात आलेली आपट्याची रोपे भेट देवून साजरा करण्याचा आग्रह केला आहे.
रोपवाटिका हा मुद्दा केंद्र स्थानी ठेवून सदर उपक्रम राबविताना शाळेने गांडूळखत निर्मिती प्रकल्पाद्वारे कचरा व्यवस्थापन, विकत घेतलेल्या पाण्याचे टाकीचे छतावरील पाण्याचे संकलनाद्वारे पाणी संवर्धन, तसेच आपल्या परिसरातील आढळणाऱ्या वनस्पतींचा व त्यांवर अवलंबून असलेल्या सजीवांचा केलेल्या अभ्यासाद्वारे जैवविधता सारख्या संबधित विषयांचे ज्ञान ही मिळविले. पर्यावरण शिक्षणाची सांगड घालत शाळेने स्थानिक पर्यावरण समस्या सोडविण्याचा केलेला हा प्रयत्न स्तुत्य आहे. एका इंग्रजी म्हणीचा नकळत अर्थ हि समजवून गेले- PLANT A TREE, PLANT A HOPE (झाडे लावा, सकारात्मक जीवनाची नवीन आशा निर्माण करा.)
रोपवाटिका

रोपवाटिका 



शाळेतील रोपवाटिका



सुट्टी दरम्यान रोपवाटीकेतील रोपांची निगा राखण्याचे स्वप्रेरनेने काम करताना शाळेचा कर्मचारी श्री. अजित गुरव.


जेवणाच्या सुट्टी दरम्यान रोपांना पाणी घालताना विद्यार्थी.

रोपवाटिका 


रोपवाटिके शेजारील कंपोस्ट खड्डा