Tuesday, 13 June 2017

रोपवाटिका – शिकण्याचा आनंद
शासनाने वर्ष २०१६ मध्ये २ कोटी रोप लागवडीचे उद्दिष्ट्य ठेवले होते. त्यानुसार प्रत्येक शासकीय सेवेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्याना ठराविक झाडे लावण्याचे उद्दिष्ट्य दिले होते. याचबरोबर समाजात आता प्रसारमाध्यमातून झाडे लावण्याबाबतचे बरेचसे प्रबोधन होत आहे. यामुळे वर्षाच्या सुरुवातीला रोपे विकत घेवून त्यांची लागवड करण्यावर सर्वांचा भर असतो. त्यामुळे उपलब्ध होतील ती सर्व रोपे घेवून लावण्यात येतात.
सन २०१६-१७ मध्ये पुणे विभागात योजने अंतर्गत सहभागी असणाऱ्या पुणे व सोलापूर जिल्ह्यातील ११ शाळेमध्ये स्थानिक झाडांची रोपवाटिका बनविण्याचा निर्णय शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी चर्चा करून घेतला. रोपवाटिका तयार करण्याचा उद्देश फक्त बिया आणून लावणे व रोपे तयार करणे एवढाच नव्हता. यामध्ये विद्यार्थ्यांना झाडांची ओळख होणे, फुलांची, फळांची व बियांची ओळख होणे, बिया संकलन करणे त्यांची साठवणूक पद्धती समजावून घेणे, शास्त्रीय पद्धतीने बिया पिशव्यामध्ये लावणे, बियांच्या उगवण क्षमतेचा अभ्यास करणे, रोपांच्या वाढीचा अभ्यास करणे अशा टप्प्यांचा समावेश होता.
रोपवाटिकेची सुरुवात बिया गोळा करण्यापासून झाली. यामध्ये मागच्या उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील झाडांच्या बिया संकलित केल्या. उन्हाळ्यात संकलित केलेल्या बिया जून – जुलैपर्यंत टिकवायच्या होत्या. यासाठी विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या बिया राखेत ठेवल्या व त्यामध्ये कडूलिंबाचा पाला घातला. यानंतर विद्यार्थ्यांनी जुलै महिन्यात शास्त्रीय पद्धतीने पिशव्या भरून त्यामध्ये बिया लावल्या. यामध्ये माती व खत किती घ्यायचे, पिशवी किती भरायची, बिया किती खोलीवर लावायच्या याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी बिया पिशवीमध्ये लावल्या. बिया पिशवीत लावून विद्यार्थ्यांची जबाबदारी संपली नाही. बी लावल्यापासून ती किती दिवसात उगवून येते याची नोंद प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठेवली. लावलेल्या बियापैकी किती बिया उगवल्या याच्या आधारावर बियांची उगवण क्षमता समजावून घेतली.
पुणे विभागातील ११ शाळेतील रोपवाटिकेमध्ये विद्यार्थ्यांनी ४२ वेगवेगळ्या प्रकारच्या स्थानिक झाडांच्या बिया वापरून रोपवाटिका तयार केली. योजने अंतर्गत शाळामध्ये १०८४९ बिया लावण्यात आल्या होत्या. लावलेल्या १०८४५९ बियापैकी ५५१२ बिया उगवून आल्या. ५५१२ रोपांपैकी १९८० (३६%) रोपे शाळेत येणारे पाहुणे, ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना देण्यात आली तर काही शाळेच्या परिसरात लावण्यात आली. तर १९३७ (३५%) रोपे उगवून आल्यानंतर पुरेसे संरक्षण नसल्यामुळे तर यातील काही रोपे उगवून आल्यानंतर पाण्याअभावी जळून गेली. उर्वरित १५९५ (२९%) रोपे उन्हाळ्यातही विद्यार्थी व शिक्षक जोपासत आहेत.
रोपवाटिका उपक्रम फक्त रोपे बनविण्यापर्यंत मर्यादित राहिला नाही यामध्ये विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान, भूगोल या विषयाचा हि अभ्यास केला. एका शिक्षकांनी रोपवाटिका उपक्रम इंग्रजी विषयातील एक धड्याशी जोडून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून समजावून सांगितला.
शाळेमध्ये अंदाजित १००० रोपांची रोपवाटिका तयार करण्याचे उद्दिष्ट होते. परंतु मोठ्या झालेल्या रोपांच काय करायचं हा शाळेसमोर प्रश्नच होता. शाळेमध्ये तयार झालेली रोपे ग्रामस्थांना वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण यामध्ये रोपांच्या बदल्यात पैसे न घेता (cashless) ग्रामस्थांकडून वस्तू किवा सेवा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
उदा. करंजाचे १० झाड शाळेने ग्रामस्थांना दिल्यानंतर त्या किमतीची वस्तू किवा त्याबदल्यात श्रम गावकऱ्यानी शाळेसाठी द्यावे असे ठरवण्यात आले. पहिल्यांदा हे जरा अवघड वाटले, परंतु सालसे (ता. करमाळा) शाळेतील अनुभव प्रेरणादायी ठरला. गावातील एका संस्थेने त्यांच्या परिसरामध्ये लावण्यासाठी ४० रोपे शाळेच्या रोपवाटिकेतून घेतली. या रोपाच्या बदल्यात पैसे न घेण्याची भूमिका शिक्षकांनी घेतली. याचबरोबर शिक्षकांनी पैसे न घेण्याची भूमिका हि समजावून सांगितली व शाळेला उपयोगी अशी वस्तू देण्याची विनंती केली. शाळा पैसे घेत नाही अस ऐकणे त्यांच्यासाठी आश्चर्याचा धक्काच होता. परंतु पुढच्याच क्षणी त्या संस्थेने स्वेच्छेने शाळेसाठी २००० लिटरची पाण्याची टाकी दिली. यामुळे रोपवाटिकेच्या व्यवहारातून पैसा काढून वस्तू स्वरुपात व्यवहार केल्यामुळे पारदर्शकता आली व शाळा, गाव व इतर संस्थेमध्ये जिव्हाळ्याचे वातावरण तयार होत आहे. .
रोपवाटिका हा शाळेचा फक्त एक उपक्रम न राहता, यातून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळाले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील झाडांची ओळख करून घेतली. बी पासून रोप होण्याचा प्रवास विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवला आणि फक्त पुस्तकात न वाचता तर प्रत्यक्ष कृतीतून वैज्ञानिक दृष्ट्या बऱ्याचशा गोष्टी समजून घेतल्या.
अशाप्रकारे पर्यावरण सेवा योजनेच्या माध्यमातून शाळा व गाव पातळीवर रोपवाटिका उपक्रम जोरदारपणे राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक शिक्षकांबरोबर ग्रामस्थ हि करत आहेत.
महाराष्ट्र शासन, पर्यावरण विभाग पुरस्कृत पर्यावरण सेवा योजना माध्यमिक शाळेमध्ये राबविली जाते. सदर योजनेसाठी राज्य सनियंत्रण संस्था म्हणून पर्यावरण शिक्षण केंद्र काम पाहते. पर्यावरण सेवा योजनेमध्ये प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. बहुतेक वेळा शासकीय योजना म्हणजे अतिरिक्त जबाबदारी असा समज होतो. परंतु पर्यावरण सेवा योजनेमध्ये पर्यावरण हा विषय अभ्यासक्रमातील इतर विषयांशी जोडून कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवला जातो. योजने अंतर्गत पाणी, उर्जा, घनकचरा, जैवविविधता व संस्कृती आणि वारसा या विषयवार काम केले जाते. योजनेचा मुख्य उद्देश हा स्थानिक पर्यावरण समस्या शोधून त्या लोकसहभागातून सोडवणे, भविष्यात पर्यावरणीय दृष्ट्या जबाबदार नागरिक तयार करणे असा आहे.

गणेश सातव
विभाग समन्वयक,
पर्यावरण सेवा योजना (महाराष्ट्र शासन, पर्यावरण विभाग पुरस्कृत)
पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे






Thursday, 18 May 2017

शाळेचे नाव - दिगंबरराव बागल विद्यालय कुंभेज, ता. करमाळा, जि. सोलापूर
योजना प्रमुख - श्री कल्याणराव साळुंखे सर




शाळेचे नाव - दिगंबरराव बागल विद्यालय कुंभेज, ता. करमाळा, जि. सोलापूर  
योजना प्रमुख - श्री कल्याणराव साळुंखे सर




Tuesday, 9 May 2017


शाळेचे नाव - दिगंबरराव बागल विद्यालय कुंभेज, ता. करमाळा, जि. सोलापूर

पर्यावरण सेवा योजने अंतर्गत बागल विद्यालयाने पक्ष्यांसाठी 'बर्ड रेस्टॉरंट' हा उपक्रम राबविलेला आहे. यामध्ये विद्यालय परिसर व गावामध्ये पक्ष्यांसाठी पाणी व खाद्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेने राबविलेल्या उपक्रमाची दाखल दै. संचारने घेवून याबाबत बातमी प्रसिद्ध केली.



Monday, 8 May 2017


उन्हाळ्यामध्ये माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, तिथे पक्ष्यांचा व प्राण्यांचा कोण विचार करतय?
पर्यावरण सेवा योजने अंतर्गत काम करणाऱ्या दिगंबरराव बागल विद्यालय कुंभेज ता. करमाळा जि. सोलापूर येथील योजना प्रमुख श्री. कल्याणराव साळुंखे सर व विद्यार्थी पक्ष्यांना पाणी व अन्नाची सोय करण्यसाठी धडपडत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टी सुरु असताना सुद्धा कामाची जबाबदारी वाटून घेवून शिक्षक व विद्यार्थी काम करत आहेत.
सदर उपक्रमाची दखल दै. दिव्य मराठीने घेवून याबाबत सविस्तर बातमी प्रसिद्ध केली.



Tuesday, 11 April 2017

पर्यावरण सेवा योजने अंतर्गत पक्ष्यांसाठी घरटे बनविण्याची  तालुका स्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.

मार्चपासूनच उन्हाळ्याची चाहूल लागते. चालू वर्षी तर मार्चमध्येच तापमानाने ४० अंश से ओलांडले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता खूप असते. उन्हाळ्यामध्ये पूर्ण सोलापूर जिल्हा पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेले असतो. माणसासाठी वैयक्तिक स्तरावर किंवा शासन स्तरावर पिण्याचे पाणी उपलब्ध केले जाते. परंतु पक्षी आणि प्राण्याना पाण्यासाठी असे कोणतेही नियोजन केले जात नाही. उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या दुर्भिक्षामुळे किवा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे पक्ष्यांचा मृत्यू होवू शकतो.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील आठ शाळामध्ये पर्यावरण सेवा योजना राबविली जाते. यातील दिगंबरराव बागल विद्यालयात गेल्या तीन वर्षापासून ‘बर्ड रेस्टॉरंट’ हा उपक्रम राबविला जातो. यामध्ये उन्हाळ्या दरम्यान पक्ष्यांसाठी अन्न, पाणी (पिण्यासाठी व आंघोळीसाठी) व कृत्रिम घरट्यांची व्यवस्था करणे असा उपक्रम राबविले जातो. दोन वर्षापूर्वी शाळेच्या परिसरात काही पक्षी मृत अवस्थेत आढळले. विद्यार्थ्यी व शिक्षकांनी पक्ष्यांच्या मृत्यूची चिकित्सा केली असता असे लक्षात आले कि पाण्याच्या दुर्भिक्षामुळेच पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. या सर्व बाबींचा शिक्षकांनी चर्चा केली व पक्ष्यांसाठी पाणी व अन्नाची व्यवस्था करण्याचे ठरवले व इथूनच शाळेच्या ‘बर्ड रेस्टॉरंट’ उपक्रमाची सुरुवात झाली. सदर उपक्रम फक्त शाळेच्या परिसरात न राबविता विद्यार्थ्यांनी गावात हि प्रभावीपणे राबविला आहे.

तालुक्यामध्ये एका शाळेत सुरु असलेल्या उपक्रमाचा प्रचार व प्रसार करण्याचा विचार डोक्यात आला. याचबरोबर शिक्षकांनी राबविलेले उपक्रम इतरानाही कळावेत व अशा प्रकरचे उपक्रम इतर शिक्षकांनी त्यांच्या शाळेतही राबवावेत यासाठी कुंभेज येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

सदर कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून दिगंबरराव बागल विद्यालयातील योजना प्रमुख श्री. कल्याणराव साळुंखे सर व विद्यार्थ्यांनी काम पाहिले.
कार्यशाळेसाठी करमाळा तालुक्यातील सहा शाळेतून १४ शिक्षक व ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यशाळेत शिक्षकांना व विद्यार्थ्यांना घरटे बनविण्याचे मार्गदर्शन करताना साळुंके सर

पक्ष्यांसाठी खाद्यपेटी बनविण्याचे मार्गदर्शन करताना श्री. साळुंके सर 


कार्यशाळेत प्रत्यक्ष घरटी बनविताना शिक्षक व विद्यार्थी





घरटे कशी बसवावीत याचे प्रात्यक्षिक दाखविताना विद्यार्थी

कार्यशाळेबाबत प्रतिक्रिया देताना विद्यार्थी

कार्यशाळेस उपस्थित असलेले शिक्षक व विद्यार्थी 

Wednesday, 5 April 2017



पर्यावरण सेवा योजने अंतर्गत जि.प. प्राथमिक शाळा कोंढार चिंचोली ता. करमाळा, जि. सोलापूर या शाळेने दिवाळी दरम्यान फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला. फटाके खरेदीसाठी लागणारे पैसे शाळेमध्ये गोळा केले, यामध्ये शिक्षकांनी स्वच्छेने मदत केली. जमा झालेल्या पैश्यातून शाळेतील हुशार पण आर्थिक स्थितीने जेमतेम असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त कपडे भेट दिले. शाळेने फक्त पर्यावरणपूरक उपक्रम राबविले नाही तर सामाजिक बांधिलकी जपण्याचे संस्कार विद्यार्थ्यावर करण्याचा अभिनव उपक्रम राबविला. 


पर्यावरण सेवा योजने अंतर्गत दिगंबरराव बागल विद्यालयामध्ये फुलपाखरू उद्यान तयार करण्यात आले आहे. सदर उपक्रमाची माहिती वृत्तपत्राने प्रसिद्ध केली. 



पर्यावरण सेवा योजने अंतर्गत पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामधील नऊ शाळामध्ये स्थानिक वाणाच्या बिया संकलित करून रोपवाटिका तयार करण्यात आली, त्याबाबतची बातमी वृत्तपत्राने प्रसिद्ध केली. 


Monday, 3 April 2017

रोपवाटिका,पर्जन्यमापक शाळा पातळीवर तयार करण्याचे प्रशिक्षण- नाशिक विभाग


पाणी शास्वतता अभियान-कार्यशाळा-जळगाव, स्थळ-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव


पर्यावरण सेवा योजने अंतर्गत दिगंबरराव बागल विद्यालय कुंभेज, करमाळा, जि. सोलापूर येथे तयार करण्यात आलेल्या फुलपाखरू उद्यानाची बातमी दै. लोकमतने प्रसिद्ध केली.





पर्यावरण सेवा योजने अंतर्गत जलसाक्षरता उपक्रमाची दखल विप्रो संस्थेने घेवून सन २०१६-१७ करीताचा विप्रो कंपनीचा राष्ट्रीय स्तरावरील अर्थीयन पुरस्कार कोंढार चिंचोली शाळेला मिळाला. 


पर्यावरण सेवा योजने अंतर्गत पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यात राबविलेल्या उपक्रमांचा आढावा घेणारी बातमी दै. संचारने ०५/०२/ २०१७ रोजी प्रसिद्ध केली. 


स्वनिर्मितीचा आनंद घेत नैसर्गिक रंगांमधे रंगले बालगोपाळ


उपक्रम: पर्यावरणपूरक रंगपंचमी.
शाळा : दिगंबरराव बागल माध्य. विद्यालय, कुंभेज,ता.करमाळा,
जि.सोलापूर.

योजना प्रमुख :
कल्याणराव साळुंके

सध्याच्या  आधुनिक, प्रगतीच्या व धावपळीच्या युगामधे माणसाचा अर्थार्जनासाठी  सातत्याने जीवन संघर्ष सुरू आहे. सुखाच्या मागे धावून दमछाक होत असताना जरासी उसंत मिळावी व क्षणभर का होईना आनंद घेता यावा म्हणूनच आनंदाचा वर्षाव करणाऱ्या सणांचे भारतीय संस्कृतीत प्रयोजन असून त्यास अनन्य साधारण महत्त्व आहे. चैतन्यमय वसंत ऋतूच्या आगमनाबरोबरच  इंद्रधनूच्या सप्तरंगांची उधळन करत येणारा सण म्हणजे रंगपंचमी होय.

कुंभेज येथील दिगंबरराव बागल माध्य .विद्यालयात विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंग स्वतः तयार करून  रंगपंचमी सण साजरा केला तसेच कोरडे रंग (पावडर ) वापरून पाणी बचतीचा संदेशही दिला.

कृत्रीम  रंगांमधे घातक रासायनिक घटक असू शकतात असे रंग आरोग्यास अत्यंत हानीकारक असतात त्यामुळे त्वचेवर डाग पडणे, खाज सुटने, त्वचा जळजळणे, डोळे लाल होणे किंवा गंभीर इजा होणे,पुरळ येणे, तसेच त्वचेचा कर्करोग होण्याची ही शक्यता असते म्हणून असे रंग न वापरणे हीतकारक असते या ऊलट नैसर्गिक रंगांमधील हळद, बेसन, मुलतानी माती इ.घटक त्वचा उजळ करून  त्वचेचे सौदर्य वाढवतात थोड्या श्रमात व कमीत कमी खर्चामधे नैसर्गिक रंग तयार करता येतात.

नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी  सहज उपलब्ध होणाऱ्या हिरव्या पालेभाज्या,पालक कोथिंबीर , गुलमोहोराची पाने, व कडूनिंबाचा पाला मिक्सरच्या साहाय्याने पेस्ट करून त्यांचा वापर केला. लाल रंग तयार करण्यासाठी गाजर , टोमॅटो यांचा वापर केला. किरमिजी रंग बीटापासून मिळवला तर लाल रंग हा रक्तचंदनाच्या काडया उगाळून तयार करता आला. पिवळा रंग खाण्याच्या हळदीपासून तयार केला. सुके रंग तयार करण्यासाठी मुलतानी माती बेसन पीठ , हळद इ. चा वापर केला.

शरीराला कोणताही अपाय होत नसल्याने मुलांनी ह्या रंगांचा मनमुराद आनंद घेत एकमेकांवर रंग फेकत रंगांचा उत्सव साजरा करून गदिमांच्या 'रंग फेका रे...... ' या गीताची आठवण करून दिली.
'देणे'हा निसर्गाचा गुण तर या उलट 'घेणे'हा मानवाचा स्वभाव बनला आणि ही सवय एवढी बळावली की माणूस निसर्गाला अक्षरक्षः ओरबाडू लागला . म्हणूनच  वेळीच सावध होण्याची गरज  निर्माण झाली आहे. आणि या साठी आपली प्रत्येक कृती आपले प्रत्येक पाऊल निसर्ग संवर्धणासाठी सरसावले पाहिजे. निसर्ग संवर्धनाचा संकल्प करून

महाराष्ट्र शासन पुरस्कृत पर्यावरण सेवा योजनेच्या माध्यमातून पूणे विभागीय समन्वयक गणेश सातव यांच्या मार्गदर्शनानुसार व मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांच्या प्रोत्साहन तून योजना प्रमुख कल्याणराव साळुंके हे आपले सहकारी शिक्षक श्री.विष्णू पोळ, श्री.सिताराम बनसोडे, श्री.संतोष शिंदे यांच्या सहकार्याने  विद्यालयात  सर्व सण समारंभ पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करत आहेत.
या अभिनव उपक्रमाचे सरपंच, ग्रामपंचायत कुंभेज, शिवराजे तरुण मंडळ , ज्योतिर्लिंग तरुण मंडळ, जनसेवा तरूण मंडळ , जय महाराष्ट्र तरूण मंडळ,शिवस्वराज्य प्रतिष्ठाण,कुंभेज व पोफळज ग्रामस्थ तसेच पालकांनी कौतुक केले.